
पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले; रासाई-शेंडूर येथे पर्यावरणदिन
निपाणी (वार्ता) : निसर्ग वाचविणे म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे, तर पुढील पिढीचे भविष्य सुरक्षित करणे गरजेचे आहे. वाढते प्रदूषण, उष्णतेची तीव्रता, नष्ट होत चाललेली जंगलसंपदा आणि मानवी स्वार्थामुळे बिघडत आहे. मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम सुखामागे धावताना माणूस निसर्गापासून दूर जात आहे. पण जगण्यासाठी ऑक्सिजनच लागणार आहे, आणि तो झाडेच देणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवशी एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रासाई-शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूल आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एम. मधाळे होते. यावेळी वृक्षारोपणासाठी १० ते ११ फुट उंचीची वड, जांभूळ, पिंपळ, करंज आणि महोगणी यांसारखी दीर्घायुषी व पर्यावरणपूरक रोपे शाळेला भेट देण्यात आली. याशिवाय ‘निसर्गदूत’ ही पर्यावरण जनजागृती करणारी पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. मुख्याध्यापक बी. एम. मधाळे यांनी, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांच्या पर्यावरण कार्याचे कौतुक करून समाजाला दिशा देणारे असे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमास आर. एम. केसरकर, आय. एस. जबडे, ए. ए. टेंबुगडे,एस. एम. भोसले, आर. एस. गडकरी, वाय. पी. धोंडफोडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta