

कोप्पळ : कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील कुकनूर तालुक्यात भानापूरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात मंत्रालयाकडे निघालेल्या ओम्नी कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या अशोक लेलँड ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्यावरील दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या ओम्नी कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात केंचम्मा बाळेकायी (वय ३५), अमृता कोट्याळ (२५), रमेश बल्लारी (४५), प्रविण बाळेकायी (४०) आणि चिन्मय यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून कोप्पळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंद करून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू केला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta